Monday 19 November 2012

ह्याक, ह्याक

ह्याक, ह्याक !

by फेस बुके on Friday, October 19, 2012 at 2:49pm ·


जॉन एमब्रोस फ्लेमिंग एकदा मार्कोनीच्या वायरलेस टेलिग्राफसंदर्भात प्रयोग करून दाखवत होता. तो यशस्वी सुद्धा झाला. त्या प्रयोगाला महान जादुगार नेव्हिल मस्कलीन हजर होता. मस्कलीनला त्यात लैच त्रुटी असाव्यात असे वाटून गेले. पण त्या नेमक्या कोणत्या  हे त्याला समजेना. असे कुठे काही अडले की तत्सम तज्ञ लोक भारतात येत असत. मस्कलीन सुद्धा त्याला अपवाद कसा असणार ? तो पण अर्थातच आला. तर असाच प्रश्नाच्या उत्तरासाठी वणवण भटकून तो थकून गेला पण त्याला उत्तर मिळाले नाही. अशातच त्याला बैलगाडीवरून जाणारा एक शेतकरी दिसला. त्याने याला लिफ्ट दिली. खाणाखुणांनी दोघांचे बोलणे सुरु होते. कारण मस्कलीनला मराठी येईना आणि शेतकऱ्याला इंग्रजी !


दूरवर शेतात एक झोपडीवजा घर लागले तसा


" तुम्ही थांबा मी आलोच " असे खुणेनेच सांगून शेतकरी तिकडे गेला. तो बराच वेळ झाला येईचना. मस्कलीनने अनेक प्रकारे त्याला हाका मारून पाहिल्या पण उपयोग झाला नाही. आता काय करावे अशा विचारात त्याने बैलांना चाबूक मारून पाहिला पण ते सुद्धा जागचे हलेनात. शेतकरी एकदाचा आला त्याने सोबत बरेच खाद्यपदार्थ आणि फळे आणली होती. तो गाडीत बसला आणि त्याने ती मस्कलीन ला दिली.

त्यावर त्याने शेतकऱ्याचे आभार मानले आणि मग काय बस शेतकऱ्याने " ह्याक " आवाज करताच बैल धावू लागले ! मस्क्लीन सुद्धा आनंदाने 'ह्याक ह्याक' शब्द उच्चारून नाचू लागला. एकंदरीत "ह्याक" या शब्दाने त्याच्यावर जादूच केली. शेतकऱ्याला निरोप देताना सुद्धा लैच वेळा गहिवरून त्याने " ह्याक" शब्द निरोपादाखल उच्चारला !


नेव्हिल जादुगार असला तरी त्याने 'वायरलेस टेलिग्राफी' संदर्भात काही मुलभूत संशोधन केले होते. तो मार्कोनीचा टीकाकार आणि विरोधक मानला जात असे. मात्र त्याचा उद्देश फक्त मार्कोनीच्या वायरलेस टेलिग्राफितले दोष दाखवून देणे इतकाच होता. ह्याक शब्दाची जादूच अशी भारी की त्याने जॉन फ्लेमिंगचा प्रयोग चालू असताना ते वायरलेस मेसेजेस चक्क "ह्याक " केले आणि स्वतःचे मेसेजेस तिथे ब्रोड्कोस्ट केले. मार्कोनीच्या डिव्हायसेस मधील त्रुटी अर्थातच समोर आल्या आणि नंतर त्यात लैच वेळा सुधारणा झाल्या.

तर इतिहासातील पहिला ह्याकर नेव्हिल मस्कलीन ला लैच वेळा "ह्याक !"  :-)

मांजर आणि नेब्युलायझेशन

मांजर आणि नेब्युलायझेशन

by फेस बुके on Monday, November 5, 2012 at 6:57pm ·


तर ज्याचे काम त्याने करावे असे लैच महान लोक सांगून गेलेत, त्याची प्रचीती आज आली. आपल्याकडे एक मांजर आहे. पाळलेले नाही, पण रोज दोन पाच वेळेला येते. मुलांनी त्याला लैच लाडावून ठेवले आहे. म्हणजे ते मांजर बोर्नव्हीटा घातलेलेच दुध पिते, आणि त्याला ओरिओ बिस्कीटेच आवडतात. आपण घरी आलो म्हणजे ते पायात घोटाळत राहते. पायाने ढकलले की ते बोटांशी खेळत राहते. पायाचा अंगठा चाटत राहते. कधी आरामात बिछान्यावर आपल्या पायांशी झोपी जाते. मात्र आजपर्यंत चावले नव्हते. लैच निरुपद्रवी आहे, असा आपला समज होता.


काल आमच्या मोठ्या बच्चूने सांगितले

" पप्पा, माऊला तपासा !"

" कारे बेटा, काय झाले माऊला ?"

" तिला ना कफ झाला आहे !"

" काय सांगतोस , तुला कसे माहित ?"

" ती घुरघुर करते पप्पा !"
" अच्छा, ती आली की आपण तपासू हं बेटा !" त्याला काहीतरी सांगायचे म्हणून आपण म्हणालो. आणि दुपारी मस्त किरकोळ वामकुक्षी घेतली. मस्त गाढ झोपेत असताना पोरांनी उठवले.
" पपा , माऊ आली !"
" येउदेना बेटा मग ! जरा वेळ झोपू दे आपल्याला आणि तु पण झोप . तिला बिस्किटे दे पाहिजे तर !"
" तुम्ही तिला तपासा !"
" अरे बेटा, मांजराचे डॉक्टर्स वेगळे असतात. "
" नाही पण तिला तपासा !"

मांजराला तपासण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याच्या घशातून घुर्र्र आवाज येत होता. मांजर अशक्त वाटत  होते. पहिल्यांदा वाटले याचा घसा बसला असावा. म्हणजे फयारीन्जायटीस वगैरे .. पण नंतर लक्षात आले कि त्याची छाती जरा वेगाने धपापते आहे. तोंडाने श्वास घेत होते. "ख्याक " आवाज करून ते एकदा खोकले सुद्धा ! मग आपण त्याच्या छातीला स्टेथो लावला तर चक्क र्होंकाय ऐकू आल्या. आपण गोंधळून गेलो ! मांजराला पण थंड वातावरणामुळे, अलर्जेनस मुळे ,धुळीमुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा तत्सम फ्याकटर्समुळे स्पाझम होत असावा का ? पण मांजराला कसला आलाय स्ट्रेस ? :-) एकंदरीत आपण त्याला अलर्जीक ब्रोन्कायटीस असावा का, असा विचार करत असतानाच छोटा बच्चू म्हणाला -
" तिला काय झालं पापा ?"
" तिला थोडा कफ झाला आहे बेटा !"
" मग तिला नेबू द्याना पप्पा !"
" कोण नेबू ? "

" ते बघा नेबू !" त्याने नेब्युलाझरच्या मशिनकडे निर्देश केला.
" द्याना पप्पा !"
" द्याना पप्पा नेबू " दोन्ही पोरे हट्टालाच पेटली
" बेटा, अरे हे मशीन लहान मुलांसाठी आहे. मांजराला नाही चालत हे मशीन .त्यांचे मशीन वेगळे असते !"
पण मुले ऐकेचनात. शेवटी आपण म्हणालो " ठीक आहे आपण संध्याकाळी दुसरे मशीन आणू आणि त्याला वाफ देऊ. जा आता खेळायला !"
आपण संध्याकाळी क्लिनिकला आलो आणि सदर प्रकार विसरूनही गेलो. संध्याकाळी बायकोने फोन केला. " मुले काय म्हणताहेत ऐका !"
" हं, दे त्यांना !"
" पप्पा, पप्पा "
" हं, बेटा, बोल !"
" ते मशीन घेऊन या !"
" कशाचे मशीन ?"
" माऊला वाफ द्यायची आहे "
" बरे, बरे दुकान उघडे असले तर आणीन बेटा !"
" पप्पा नक्की आणा !"
" हो नक्की आणतो , मम्मीला दे फोन !"
" हलो "
" अगं , काय पोरांनी हट्ट लावला आहे? "
" अहो, मी काय करू पोरं ऐकतच नाहीत ! त्यांच्या समजुतीसाठी काहीतरी घेऊन या "
" त्यांना सांग पप्पा येताना खेळणी आणणार आहेत "
" माझे सांगून झालेहो , आता नाहीच ऐकत आहेत ती तर काय करू ?"
" अगं, पण मांजराला नेब्युलायझेशन कसे देणार ?"
" तुम्हीच बघा, मला त्यातले काय समजते ?आणा काहीतरी , बाय "
आता आपला अगदी नाईलाज झाला. मांजराला वाफ देण्याचे नाटक तरी करणे आवश्यक होऊन बसले होते. पण विनाकारण नेब्युलायझर ची चेंबर खराब करण्यात अर्थ वाटेना !
ओपीडी आटोपून आपण सर्जिकलचे दुकान गाठले
" नेब्युलायझरची चेंबर द्या "
" साहेब, नुसती चेंबर  काय नेता, मशीन बरेच जुने झाले असावे , नवीनच घेऊन जाना !"
" नवीन केवढ्याला ?"
" हे बघा हे साडेतीन , हे चार आणि हे दोन !"
" म्हणजे साडेतीनशे, चारशे, दोनशे ? आयला एवढे स्वस्त झालेत नेबुलायझर्स ?"
" शे नाही साहेब, हजार ! नुसती केबलच चारशे रुपयाला आहे."
" हं, आपल्याला वाटलेच. कारण खुद्द आपण पाच वर्षांपूर्वी ७ हजाराला घेतले होते. ते मेड इन जर्मनी आहे. हे चायनाचे दिसतेय "
एकंदरीत तो मनुष्य वैतागला आणि म्हणाला " साहेब , अहो तेव्हाची मशीन्स लै भारी होती. तुम्ही कशाला उगाच पैसे घालवता ? हि केबल घेऊन जा. फक्त ४०० रुपये !
 एड्ल्ट साठी पाहिजे कि पीडीयाट्रींक ?"
" मांजरासाठी " असे शब्द आपण ओठात आले होते,ते आपण  ओठातच थोपवले आणि ट्यूबींग, मास्क, चेंबर घेऊन तेथून निघालो.
घरी आल्यावर मुलांनी कुतूहलाने तो चेंबर वगैरे प्रकार पाहिला. आणि अत्यानंदाने ते मांजराची वाट पाहू लागले. पण मांजर काही आले नाही.

आपण सकाळी सकाळी नवीन चेंबर लावून मशीन सुव्यवस्थित चालते आहे याची चाचणी घेतली.
आज सकाळी मात्र ते आले.
" पप्पा आली माऊ !"
"पपा नेबू द्या तिला "
" अरे वा , आले का छान !"
आपला अर्थातच नाईलाज होता.
" ठीक आहे बेटा, आपण देऊ तिला वाफ !"
आपण अस्थ्यालीन आणि तत्सम औषधाचा डोस बनवून चेंबर मध्ये टाकला. आणि मांजराला एका हाताने पकडून ठेवले.
मांजराला तो एक नवीन खाद्यपदार्थ वाटला कि काय पण त्याने मास्क चांगला चाटून काढला. च्यायला हे मांजर वाफ देऊ देईल का नीट, शंका वाटायला लागली.
"पप्पा मी बटन सुरु करू ?"
" हं. कर बेटा, पण तुम्ही दोघे जरा दूर थांबा. मांजर घाबरून उडीबिडी मारेल अंगावर !"
मुलांनी बटन सुरु केले आणि मशीनचा सुर्र्र्रर्र्र्रर्र्र्र आवाज येऊ लागला.मांजर सुरुवातीला थोडे बिचकले पण नंतर येणाऱ्या वाफेकडे जिज्ञासेने बघू लागले
मांजराच्या तोंडाला मास्क बांधणे म्हणजे निव्वळ त्याच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखे लैच वेळा होते. पण मांजर हा एकंदरीत गरीब प्राणी असल्याचा समज असल्याने एकदाचा मास्क त्याच्या गळ्यात अडकवला. त्याने आधी तो मास्क चांगला चाटून काढला. नंतर त्याची चळवळ सुरु झाली. एरवी लहान मुले वाफ घेताना करतात, तसेच हातवारे ते करू लागले. पण आपण त्याला घट्ट पकडून ठेवले होते. आता त्याची गुरगुर वाढली. आणि ते सुटण्यासाठी धडपड करू लागले. पण चारशे रुपये खर्च केला आहे, तर निदान त्याला पूर्ण वाफ द्यावी म्हणून आपण त्याला धीर देत राहिलो. आता मांजराची सहनशक्ती संपली आणि त्याने धडपडून स्वतःची सुटका करून घेतली. तो मास्क सुद्धा ओरबाडून काढून टाकला. आणि फिस्कारून खाली उडी मारली .पायाला काही टोचल्यासारखे जाणवले पण त्या गडबडीत आपण लक्ष दिले नाही.

" पप्पा नक्त .." छोटा बच्चू ओरडला .आपण पहिले तर आपल्या पायावर रक्ताची एक लालभडक रेष उमटलेली. थोडक्यात मांजराने आपल्याला चावा घेतला होता.
" सॉरी हो, मीच मुलांच्या हट्टाला बळी पडले. थांबा मी ब्यांडेज आणते" बायको म्हणाली.
" अगं प्राणी चावल्यावर ब्यांडेज शक्यतो बांधत नाहीत. "
" पण तुम्ही लावा काहीतरी पायाला." ती रडवेल्या आवाजात म्हणाली
आपण मांजराला  "रिल्याक्स ,रिल्याक्स" असे म्हणून  पुन्हा जवळ घेतले आणि त्याला थोपटले. त्यानंतर ते थोडे शांत झाले आणि आपल्या पायाशी खेळून माफी मागू लागले. त्यातच त्याने चावा घेतलेला भाग चाटून काढला. आता हे म्हणजे आणखीच वाईट प्रकार होता. पण त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला काय कळते ? आपण आपला पाय साबणाने धुवून काढला.
नंतर मोठ्या बच्चूने मांजराला "हाड हाड " करून हाकलून दिले.
आणि मांजरही त्याच्या आज्ञेचे पालन करीत निघून गेले. संध्याकाळी मांजर नेहमीप्रमाणे आले तर मस्त ठणठणीत वाटले. एकंदरीत वाफाऱ्याचा उपयोग झाला असावा की काय कळेना!
आता आपण एन्टी ऱ्याबीज व्ह्याकसीन घ्यावे की नाही, असा विचार करत आहोत.
टीप : कुणाला त्यांच्या मांजरास नेबुलायझेशन द्यावयाचे असल्यास कृपया पत्ता कळवावा. स्वखर्चाने नेबुलायझेशन चेंबर, ट्यूबिंग आणि मास्क मोफत पाठवू. अर्थातच धन्यवाद ! :-)

Friday 27 July 2012

स्वप्न

स्वप्नं लैच काहीच्या बाही पडतात च्यामायला ,दिवसाढवळ्या !  तर आपण निशाचर असल्यामुळे दिवसा सुमारे २-३ तास डुलकी घेत असतो, हे ओघानेच आले. पण झोप कधी लागते कधी लागत नाही. म्हणून आपल्याला जेव्हा झोप लागते, तेव्हा लैच तर्राट झोपतो आपण. बायको सुद्धा आपल्याला उठवण्याची हिम्मत करीत नाही; मात्र सदर जबाबदारी ती माझ्या दोन्ही बच्चूंवर सोपवत असते. तर आज असाच मस्त झोपलो होतो आणि स्वप्न पडलं. ते स्वप्न होतं हे नंतर समजलं. कारण स्वप्नात हे स्वप्न आहे, असे लैच वेळा समजत नाही. 

एका मोठ्या हॉलमध्ये कसला तरी क्लास , प्रवचन किंवा तसाच काही प्रोग्राम सुरु आहे. आपण आणि आपला एक मित्र तिथे जातो. नंतर ते लेक्चर किंवा जे काय असते, ते अटेण्ड करतो. आजूबाजूला लैच खोल्या आणि बेंचेस सर्व डॉक्टरमंडळी बसलेली. काही नवीन पोट्टे बेंचवर बसून झोपा काढताहेत.

'च्यायचे xyz' अशी शिवी आपण त्यांना देतो 'आयला हे लेक्चर ऐकायचे सोडून झोपतात भोसडीचे".

मित्र सुद्धा या शिवीला समर्थनार्थ मान हलवतो आणि मग व्यासपिठापासून दूर असल्याने मित्राशी मनमुराद गप्पा होतात. आता इथे एक फेसबुकवरचे मित्र येतात.हे अचानक कुठून उगवतात, समजत नाही.

"फेसबुके, चालेल आपल्याला. आपण आपण हा हॉल तीस लाखाला विकत घेऊ !
"अच्छा , अच्छा. बघू गुरुजी , प्रयत्न करू आपण" म्हणजे तो हॉल विक्री होता की काय कळेना !

त्यानंतर आम्ही त्या जागेची संपूर्ण पाहणी करून घेतो. दरम्यानच्या काळात ते व्याख्यान , विद्यार्थी आणि तत्सम लोक कुठे अंतर्धान पावतात कोण जाणे ! नंतर जेवणाच्या वासाने ते तत्सम विद्यार्थी जागे होतात. आणि समोरच्या आरशात फिल्मी स्टाईलने भांग बिंग पाडून थोबाड पाहतात.कारण सदर कार्यक्रमानंतर सुरुचीभोजन अर्थातच असते.

"च्यामायला, हे फक्त हादडायला येतात साले " इति मित्र
"हं, चलता है, दुनिया है. आपण तरी कुठे ऐकले लेक्चर ?"

यांनंतर आपल्या मोबाईलची रिंग वाजते.  एक मैत्रीण बोलत असते. ती आपल्याला भेटायला तिकडेच येणार असते. आता ही भेट नेहमीप्रमाणे कुठे ठरली होती, काहीच संदर्भ लागत नाही. मात्र स्वप्नात तो लैच वेळा लागत असतो.
"हो, झालेच आता. दहा मिनिटांनी फ्री होईन !"
"मी पोचते दहा मिनिटांत "
"चालेल "

"एफबी तू सुधरणार नाहीस !" इति मित्र
"हाहाहा, त्यात काय नवीन विशेष ?"

एकदाचे ते तत्सम व्याख्यान, भजन , कीर्तन किंवा जे काय असेल,ते संपते. आणि आम्ही हॉलच्या बाहेर येतो. समोरून ती येते; पण ही वेगळीच मैत्रीण असते. एरवी मस्त साडीत वगैरे असणारी ती लैच मॉडर्न ड्रेस घालून वगैरे. यावेळी भर उन्हात ती लैच मस्त दिसते.आणि आपण चक्क अनवाणी. शूज कुठे गेले, हा प्रश्न तेव्हा लैच वेळा पडत नाही.

"चल "
"हं, चल" म्हणत आपण सोबतच्या मित्राची चिंता न करता तिच्यासोबत चालू लागतो. आणि सोबत आलेला मित्र त्याच्या सायकलवर बसून संतापून निघून जातो. खरे म्हणजे हा मित्र आणि आपण स्वतः त्याच्याच कारने इथे या तथाकथित प्रोग्रामला आलेलो असतो. मग हा आता सायकलवरून कसा काय जातोय किंवा सायकल हा लैच वेळा कालातीत झालेला प्रकार तिथे कसा आला ,हा प्रश्न सतावत नाही. मात्र माझी मैत्रीण त्याच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकते, आणि आम्ही मार्गस्थ होतो.

यानंतर माझ्या छोट्या बच्चूने आपल्याला झोपेतून उठवले. आपण  " ये बेटा, झोप माझ्याजवळ ! " असे म्हणून त्यालाही झोपवले आणि तो सुद्धा बिचारा आपल्याजवळ झोपी गेला आणि खुद्द आपण सुद्धा पुन्हा झोपी गेलो. आता याला काय म्हणावे ?

तर स्वप्न पुन्हा कंटीन्यू झाले पण ते अगदीच किरकोळ होते. आता ती मैत्रीण अंतर्धान पावलेली. आपण त्या पूर्वीच्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो.

"अजून साले किती उशीर करून राहिलेत. अजून प्लेट्स सुद्धा नाहीत इथे !" असा विचार करून आपण गुलाबजामच्या स्टालवर आलो आणि गुलाबजाम उचलला. आणि .. पुढे काही नाही, बायको ओरडत होती

"अहो, उठा. काय बडबडताय, साडेपाच झालेत !"
'सकाळचे की संध्याकाळचे ?" आपण अर्धवट झोपेत विचारले. तिने कपाळाला हात लावला. पण आपल्याला अर्थातच ताप वगैरे नव्हता !

आपण उठलो फ्रेश झालो ,चहा घेतला आणि क्लिनिकला आलो. आता रात्री ते स्वप्न कंटीन्यू होतंय का पाहतो !

Monday 14 May 2012

नागझिरा : एक सफर

           तर मनुष्याने नेहमी देशाटन करावे म्हणजे तत्सम विद्वान लोक भेटतात, तुम्हाला ज्ञान, मानसन्मान आणि इत्यादी गोष्टी प्राप्त होतात, असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे . आपण तसे लहानपणापासून उपद्व्यापी आहोत. लैच ठिकाणी भटकलो. अचानक कुठेही जाऊन टपकणे आपल्याला आवडते, मग ते जंगल का असेना ! एकंदरीत मित्रांनी आग्रह केल्यामुळे आपण या पूर्वनियोजित पण आपल्यासाठी अचानक अशा नागझिरा नावाच्या सफरीस होकार दिला. कारण ऐनवेळी त्या मित्रांच्यामधील एक जण 'अर्थभयास्तव' गायब झाला होता. आपल्याला वाघ नामक प्राण्याबद्दल लहानपणापासून कुतूहल आहे. सर्कशीत आणि प्राणीसंग्रहालयात आपण लैच वेळा वाघ, सिंह आणि इतर प्राणी बघितले होते.नाशिकच्या ब्रह्मगिरीची वारी आपण ५० वेळा केली असेल, पण माकडासारखा प्राणी सोडल्यास कुत्रा सुद्धा बघायला मिळाला नव्हता. एकदा भिमाशंकरच्या जंगलात दोन दिवस पायी भटकलो तर तिथेही निराशा झाली. जंगलातील खराखुरा पट्टेदार वाघ बघण्याची तीव्र इच्छा सतत राहिलेली होती; म्हणून आपण मान ना मान मै तेरा मेहमान असा विचार न करता तत्काळ होकार दिला आणि सर्वांचे तत्काल कोटयातून गोंदियाचे रिझर्वेशन केले. आमच्या पक्षीमित्र मित्राने सांगीतले की त्याचे तेथिल फॉरेस्ट ऑफिसर नामक इसमाशी बोलणे झाले असून आमच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय गोंदियापासून नागझिरा येथे जाण्यास्तव एक जिप्सी तयार ठेवण्यात आल्याचे समजले. आता हे म्हणजे लैच भारी झाले, असा विचार करून आपण त्या पक्षीमित्र मित्राचे लैच वेळा आभार मानले. आणि त्यानेही आपण त्याचेसोबत येत असल्याने आपले आभार मानले.

सहाशे किलोमीटर अंतर पार करून गोंदिया आले तेव्हा आपण गाढ झोपेत होतो. आपण आपल्या पक्षीमित्र आणि इतर चार मित्रांसोबत प्ल्याटफॉर्मवरून जात असता वाघ सिंह,हरीण,वानरे आणि इतर सर्व प्राणी  एक साथ आमच्यासोबत दादऱ्यावरून जात आहोत, हे पाहून आपण अचंबित झालो. कारण त्यात मनुष्यप्राणी असे आम्ही सहा लोक फक्त होतो. अर्थात आपण स्वतः , एक पक्षीमित्र आणि इतर चार मित्र ! (त्यांची नावे विस्तारभयास्तव देणे टाळत आहे.)


"ए चायss ए चाय चाय चाय ए ssss " "फेस बुके, गोंदिया आले, उठा!"
अशा अनुक्रमे चायवाला आणि पंचमित्र यांच्या आवाजाने जाग आल्यावर सदरील प्रकार हा निव्वळ स्वप्न असल्याचे लक्षात आले. मग ताजेतवाने होऊन चहा नामक गरम पाणी प्राशन केले.हा चहा आपण आजवर घेतलेला सर्वात बंडल चहा होता.एकंदरीत तर ते लैच वेळा असो.

गोंदिया स्टेशन मात्र दिसायला छान आहे. मात्र आपण अमुक एका दिशेस जायला हवे,असे अंदाजे बरोबर सांगीतले आणि मित्रांनी  तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे . ईस्ट वेस्ट प्रकाराचा गोंधळ झाल्यामुळे बराच मोठा फेरा पडून विरुध्द दिशेस पुन्हा मार्गक्रमण करीत आलो. स्टेशनबाहेर दूरदूर तक हॉटेल दिसले नाही, म्हणून विचारत विचारत सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका फेमस टपरीवजा हॉटेलात डाळवडे खाल्ले आणि चहा घेतला.इथला चहा खरोखरच छान होता; खोटे कशास बोला! यानंतर पक्षीमित्राने तत्सम गाडीवानास फोन लावला. त्याने आपण केव्हाचेच निघालो असून पोचतोच आहोत असे सांगीतले. या सत्वर सेवेची तारिफ करत आम्ही अडीच तास घालवले आणि शेवटी त्याला शिव्या घालण्याच्या विचाराशी येईपर्यंत तो मनुष्य हजर झाला आणि आपल्या हातून होणारे शाब्दिक पातक टळले. त्याने आणलेल्या ओम्नी नामक यंत्रात बसलो आणि मंगेसरी येथे पोचलो.तेथे पूर्वीच ठरल्याप्रमाणे आम्हाला एक मोठी राहुटी (टेन्ट) देण्यात आली .आत एअर कुलर वगैरे, लाईट, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था पाहून "पैसे वसूल" असा आनंद झाला.आली.गेल्यागेल्या आंघोळ आटोपून थोड्या गप्पा झाल्यावर जेवणाची ऑर्डर दिली. जेवण साधेच पण मस्त होते. लैच बरे वाटले.

दुपारी दोनेक तास झोप काढून झाल्यावर नवेगाव बांधला निघालो. रस्त्यात अनेक ठिकाणी हजारो झाडांचे ओंडके कापून ठेवण्यात आले होते. जंगलात अनेक झाडांच्या मुळाशी राख आढळून आली. एक दोन ठिकाणी आग पेटवली गेली होती. हा प्रकार तेंदुपत्ता जाळण्यासाठी केला जात असल्याचे समजले.हा नेमका काय प्रकार होता, ते समजू शकले नाही.संबंधितांनी तेथे जाऊन निरिक्षण करावे आणि नोंद घ्यावी.शिवाय अनेक झाडांची मुळे उघडी पडलेली होती. काही ठिकाणी मुळे खोदल्यासारखी वाटत होती. सदर मुळांच्या ठिकाणी थोडी माती आणून टाकल्यास ती झाडे जगू शकतात का? याचाही संबंधित लोकांनी लैच वेळा विचार करावा. नवेगाव बांध येथे न्याशनल वन्यजीव पार्क असून त्याची लैच दुर्दशा झालेली आढळली.

नवेगाव येथिल तलाव म्हणजे लैच भारी आहे. एकदम आवडला. . इथे पूर्वी सारस पक्षी असायचे असे ऐकले. मात्र आता एकही दिसला नाही. बगळे आणि पाणकोंबड्या दिसल्या.मासेमारी करणारे एक दोन आदिवासी सोडल्यास फार काही लोक दिसले नाहीत. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक जोडपी हातात हात गुंफून तलावावर मुक्त संचार करताना आढळून आली. असा आनंद घ्यायला आपल्याला सुद्धा लैच वेळा आवडला असता. एकंदरीत ते अशक्य असल्याने आपण आपला मोर्चा "नवेगाव न्याशनल  पार्क" कडे वळवला. इथे लैच प्राणी बघायला मिळतील असे वाटले होते, पण फक्त एक झोपाळू बिबट्या आणि एक अशक्त हरीण बघायला मिळाले. पार्कात सर्वत्र अस्वच्छता होती. पर्यटक त्या झोपलेल्या बिबट्याला आरडून ओरडून जागा करण्याचा प्रयत्न करत होते. हे म्हणजे वन्य जीवांना लैच वेळा त्रासदायक असते.कदाचीत हे रोजचेच असल्यामुळे त्या बिबट्याने कुणासही भीक घातली नाही आणि तो आपला निवांत पडून राहिला.अशाप्रकारे त्या राष्ट्रीय वन्यजीव उद्यानात केवळ दोन वन्यजीव पाहून आम्ही जवळच असलेल्या इटाई डोह येथे भेट दिली. हे खूपच सुंदर ठिकाण आहे. विस्तीर्ण निळ्याशार जलसाठ्यात मोठाली दोन तीन बेटे म्हणजे छोटे डोंगरच  ! त्या बेटांच्या टोकावर जाऊन सर्वत्र निरखून पहावेसे वाटले पण ते शक्य झाले नाही, कारण तिथे बोटी होत्या पण बोटीने प्रवास करण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई होती.अर्थात नागझिरा येथिल रेस्टहाउसवर परतलो.

  इथे म्हणजे नागझिरा अभयारण्यात दारू पिण्यास सक्त मनाई असली तरी हवी ती दारू म्हणजे मोह,गावठी, बिअर, व्हिस्की, रम आणि इतर तत्सम प्रकार इथे दुप्पट भावाने मिळतात. आपण निर्व्यसनी असल्यामुळे फक्त एक सिगारेट हॉटेलमालकाच्या परवानगीने ओढली! कारण हॉटेल खाजगी होते, आणि तिथे त्यावेळी केवळ आपण फक्त उपस्थित असल्याने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करू नये-हा नियम आपण मोडला नाही.संध्याकाळी जेवणात मित्रांनी नॉनव्हेज आणि आपण रुचकर व्हेज डिशेस चा मनसोक्त आस्वाद घेतला .सदर जेवणाचे वेळी आपण सोबतच्या पक्षीमित्रास तो कोंबडीचे सुग्रास जेवण घेत असताना, एक प्रश्न विचारला
" कोंबडी हा पदार्थ पक्ष्यांमध्ये मोडतो का? " थोडक्यात पक्षीमित्र लोकांनी कोंबडी खावी किंवा कसे, असा आपल्या बोलण्याचा मतीतार्थ लक्षात घेऊन त्याने या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.  यानंतर गाडीवान आला. त्याने किलोमीटर प्रमाणे ३०० किमीचे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले, त्याला २४०० रुपये देऊन झाल्यावर ही जी मरतुकडी गाडी आम्हाला घेण्यासाठी पाठवण्यात आली , ती फुकट नव्हती, असे समजले .एकंदरीत आपण त्याचे आभार मानून त्यास पैसे देऊन रवाना केले. दुसऱ्या दिवशी जीप्सीतून सफारी करावयाची असल्याने लवकर झोपी गेलो.

   आम्ही सफारीच्या एकूण तीन ट्रिप्स ठरवल्या होत्या कारण सर्वांना वाघ नामक प्राणी बघावयाचा होता.जेवढ्या जास्त सफारी, तेवढी जास्त वाघ दिसण्याची अधिक शक्यता असते; हे लैच वेळा आपण जाणतोच.नागझिरा येथे सुमारे १० वाघ असल्याचे समजले. त्यात 'डेणू' नामक वाघ अधिक उमदे जनावर आहे. त्याची फ्यामिली ४ लोकांची असून त्याला 'A' MARK नामक वाघीण आणि दोन मुले जय आणि विरू आहेत. 'A'MARK वाघिणीच्या मागच्या डाव्या पायावर A च्या आकाराचे चिन्ह आहे. जय आणि वीरूच्या नावांची उत्पत्ती कशी झाली, ते मात्र समजू शकले नाही.तर आपण पहिल्या सफारीला आपण लैच उत्सुक होतो.जंगल लैच घनदाट असल्याचे ऐकून होतो. कारण मारुती चितमपल्ली, किरण पुरंदरे, दांडेकर आणि तत्सम महान लोक इथे लैच वेळा वास्तव्य करून होते.आणि त्यांनी त्यावर लैच भारी लिहिले असल्याचे आपण सर्वजण जाणून आहोतच.पण वास्तवात आता नागझिरा पूर्वीचा राहिला नाही. विरळ आणि सुकलेले वृक्ष, बऱ्याच ठिकाणी वृक्ष कापलेले आढळून आले. वृक्षांच्या प्रत्येकी दोन रांगांच्या मध्ये एखाद दोन वृक्ष धारातीर्थी पडलेले दिसले. काही वृक्षांची मुळे उघडी पडलेली दिसली; तर काही ठिकाणी वृक्षांच्या मुळाशी खोदकाम केलेले होते .काही झाडांच्या मुळाशी राख दिसत होती. हे सर्व प्रकार नेमके काय आणि कशासाठी आहेत, हे लैच वेळा समजू शकले नाहीत. हा लेख वाचून नागझिरा येथे जाणाऱ्या अभ्यासू लोकांनी याचा लैच वेळा अभ्यास करावा.

                                                                                                                       सांबर

तर दूर एक हरीण दिसले म्हणून आम्ही आमचे क्यामेरे सरसावले आणि फोटो घेतले. नंतर हरणे लैच वेळा शेकड्याने भेटत गेली. मग हरीण, सांबर, चितळ वगैरे किरकोळ वाटू लागले. सांबराच्या जोडीने आपल्याकडे पाहून "ponk sss असा आवाज काढून इतरांना धोक्याची सूचना देऊन जंगलात पळ काढला.प्राणी हे असे इशारे सामन्यतः वाघ, बिबट्या किंवा तत्सम भयावह प्राणी दिसले की मग देतात. सदर सूचनेस लोकल भाषेत "कॉलिंग" म्हटले जाते. काही लोक याला "कॉलिंग अलार्म" म्हणतात.सदर 'पोंक' प्रकाराने सहज मनात विचार आला, आपण एवढे भयंकर आहोत, दिसायला?  नंतर पुढे दुरवर एक मोठा गवा दिसला. लैच दूर असल्यामुळे फोटो घेता आले नाहीत. जे घेतले ते इथे टाकण्याच्या लायकीचे नाहीत.दोन नीलगायी दिसल्या. त्यात एक बैल होता. येथिल भाषेत मादी निलगायीला गऊ आणि नराला निलघोडा म्हणतात, असे समजले.

एका ठिकाणी एक मजेशीर दृष्य दिसले. झाडावर बसलेली माकडे झाडाची कोवळी पाने खाली हरणांना देत होती, आणि हरणे ती खात होती. प्राण्यांतील दोस्तीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. स्वजातीय माकडांविषयी द्वेष असणारी माकडे हरणांशी निरपेक्ष मैत्री करतात, हे म्हणजे लैच भारी आहे. कारण भोप्या नावाचा जो माकडांच्या कळपाचा मुख्य असतो, तो त्या कळपातील सर्व माद्यांचा उपभोग घेतो. मात्र इतर नर माकडांना तो तसा घेऊ देत नाही. कधी चुकूनमाकून एखाद्या मादीचा दुसऱ्या एका नराशी संबंध आलाच तर हा त्यांना हाणतो,किंवा मारूनही टाकतो. याच्यापासून दुखावलेले नर नंतर त्या कळपापासून वेगळे होतात, आणि एक वेगळी टोळी बनवतात. त्यांचा एक म्होरक्या ते निवडतात. आणि पूर्वीच्या कळपाचा मुख्य जो भोप्या, त्याला मारून टाकतात. आता नवीन म्होरक्या असतो,आणि नवीन राज्य असते. तो सुद्धा पूर्वीच्याच नराचा कित्ता गिरवू लागतो. आणि  पुनः तेच दुष्टचक्र चालू राहते.

एका टाक्याजवळ काही वानरे पाणी पीत होती. आणि अचानक दुरवर काही दिसले
"ते पहा"
"काय हाये "
"वाघ रस्त्यावरून चालून राहिलेत "
"छ्या, छ्या! वाघ कसे चालतील रस्त्यावर? लैच दूर हाये.."
"इकडेच येताहेत, ७-८ वाघांची टोळीच आहे "
                                                                                                         वाईल्ड डॉग्ज

आम्ही क्यामेरे सरसावून बसलो . ती टोळी पाण्याच्या टाक्याकडे आली तशी माकडे दूर जाऊन बसली. ते जंगली कुत्रे होते. एकेक करत सावधपणे पुढे आले. त्यातील एकाने टाक्यात उडी घेऊन अंग भिजवून घेतले. मग निवांत पाणी प्यायला. मग आणखी दोघे पुढे आले. त्यातील एक लैच घाबरत होता, म्हणून बाकीचे त्याच्याजवळ थांबले. आम्ही अगदी दहा फुटावर होतो,म्हणून तो आमच्याकडे संशयाने पाहत दोन घोट पाणी प्यायला आणि मग ती टोळी झाडीमागे पसार झाली. यांचे मात्र चांगले फोटो घेता आले.

"एकवेळ वाघ दिसेल, पण वाईल्ड डॉग दिसणे अवघड असते. मी सुद्धा आज पहिल्यांदाच पाहिला." पक्षीमित्र म्हणाला
"अच्छा ,अच्छा !"
"यांना वाघ सुद्धा घाबरून असतात, कारण हे टोळ्यांनी हल्ला करतात. काही ठिकाणी तर यांच्यामुळे वाघ आपला एरिया सोडून जातात."


                                            १) टायगर फ्यामिलीने मारलेला गवा
                                            २) गरुड ( mountain hawk eagle)



थोडे आणखी पुढे गेल्यावर एका ठिकाणी कॉलिंग झाल्याचे समजले म्हणून थांबलो. तिथे सांबर होते आणि त्याचा पोंक पोंक आवाज घुमत होता. आता डेणू दिसणार, अशी खात्री वाटू लागली. अजिबात आवाज करू नका, असे गाईडने फर्मावले म्हणून  आम्ही ती जंगलाची शांतता अनुभवत बसलो. अधुनमधून पक्षांचे आवाज फक्त ..पाचोळ्याची सळसळ. आणि डेणू ची वाट बघत बसलो. इतक्यात आमच्या मागून एक गाडी आली त्यांनी "काय"? असा हाताने इषारा केला. आपण "कॉलिंग" असे उत्तर दिल्यावरून ते सुद्धा क्यामेरे सरसावून बसले, अगदी जिज्ञासायुक्त शांततेचा अनुभव म्हणजे लैच भारी प्रकार होता. पाठीमागे थांबलेले लोक थांबून थांबून एकंदरीत वैतागले आणि आमच्या पुढे निघून गेले. आमच्या पुढच्या सुद्धा दोन गाड्या वैतागून गेल्या. मग आमच्यात सुद्धा हळूहळू कुजबुज सुरु झाली. संतोष नावाच्या त्या गाईडने सांगीतले की परवाच याच ठिकाणी डेणू त्याच्या गाडीवर धावून आला होता. त्याचे असे झाले की डेणू दिसला म्हणून तिथे ५-७ गाड्या जमा झाल्या. एकंदरीत डेणूला गाड्यांचा आवाज सहन होत नाही. ५-७ गाड्यांमधून ३०-३५ लोकांचे आवाज आणि गाड्यांची घरघर यामुळे केवळ १०० फुटावर असलेल्या डेणूला लैच संताप आला आणि तो अगदी ५-७ सेकंदात रस्त्यावर धावत आला मागील पायावर उभे राहून गाडीवर दोन फुटापर्यंत धावत आला. बघणारे सगळे थिजून गेले. पुतळे होऊन गेले. आणि हातातील लैच भारी क्यामेर्यांचा उपयोग होऊच शकला नाही. कारण तो विजेसारखा आला आणि तसाच निघूनही गेला. एकंदरीत बोंबलत बसण्याशिवाय कुणाजवळ पर्याय उरला नाही.

या प्रसंगाची पुनरावृत्ती व्हावी म्हणून आम्ही तिथे लैच वेळा डेणू महाराजांची प्रतीक्षा केली, पण ते काही प्रसन्न झाले नाहीत. मात्र दुरवर सांबर दिसत होते आणि कॉलिंग सुरु होते. धीर न ठेवल्याने आम्ही तेथून पुढे गेलो. आमच्या मागे दुसरी एक लीनोवो नामक गाडी येऊन थांबली. मात्र आम्ही पुढे निघून गेलो. परत येताना ती गाडी आम्हाला परत भेटली त्यातील व्यक्तीने आपल्याला 'डेणू' दिसल्याचे सांगीतले . आम्ही तेथून निघुन गेल्यावर केवळ २-३ मिनिटांनी ! आता याला लैच वेळा योगायोग म्हणावे की 'लक' ते समजले नाही. 'तरी आपण सांगत होतो, थांबा थोडे म्हणून 'असे एकमेकांना दोष देत आम्ही तंबूत परतलो. पण निदान इथे वाघ अस्तित्वात आहे,एवढे तरी समाधान मनाला होते. परत येताना एका टाक्यावर एक गरुड बसलेला होता. तो mountain hawk eagle होता.

हा बिचारा उन्हाने लैच थकलेला होता, आणि मोठ्या कष्टाने अधुनमधून घोटभर पाणी पीत होता. एकंदरीत फारच डीहायड्रेटेड होता. एरवी हवेतल्या हवेत शिकार करणाऱ्या या गरुडाजवळ किरकोळ चिमण्या आणि इतर पक्षी शेजारी बसून पाणी पीत होते. तेथेच तीन सांबर आले.आणि एकाने बिचकत बिचकत थोडे पाणी प्राशन केले, तर बाकीचे दोन आम्हाला पाहून झाडीत गायब झाले.आणि अजून एक सफारी शिल्लक होती. आम्हाला उद्या वाघ हा कोणत्याही परिस्थितीत दिसणार होताच. कारण इथे एकूण दहा वाघ होते. त्यातील किमान एक दिसायला आमची किंवा वाघाची सुद्धा काय हरकत असणार?

"आपण सकाळच्या सफारीत वाघ बघितला, की लगेच दुपारी १२ पर्यंत येथून निघू !" एक मित्र म्हणाला
"अरे पण आपले रिझर्व्हेशन रात्रीचे आहे, एवढा वेळ काय करणार ? कुठे थांबणार ?"
"काहीही करू, भटकू इकडे तिकडे पण १२ वाजेशी निघूच. कारण चेक आउट १२ वाजता असते, अन्यथा टेंटचे एका दिवसाचे भाडे वाढेल!"

हे मात्र बरोबरच असल्याने आम्ही एकमताने ते मान्य केले आणि एकमेकांनी कोणी कुठे कसे आणि किती वाघ आजवर पाहिले, याची चर्चा करीत झोपी गेलो. एका मित्राला भीमाशंकरला त्याच्या गाडीला वाघ आडवा आला होता. एकाने ताडोबाला लैच वाघ बघितले होते, तर एकाने मेळघाटला सेन्सस च्या वेळी दहा पाच वाघ बघितले होते आणि आपण सर्कशीत आणि प्राणीसंग्रहालयात हे ओघानेच आले.

सकाळी पाचलाच उठून आंघोळ आटोपून सहा वाजेशी आम्ही सफारीसाठी तयार होतो. आणि चहा वगैरे होईपर्यंत ७ वाजलेच. आज दुसरा गाईड होता याचे नाव राधेशाम होते. याला आपण म्हणालो, बाबारे, ही तिसरी सफारी असून आता तू तरी वाघ दाखव कारण आता लैच बील झाले आहे. टाका नंबर ७ जवळ कॉलिंग झाले असल्याची खबर मिळाली, म्हणून आम्ही गाडी तिकडे वळवली. पशुपक्षी इत्यादींसाठी वनखात्याने ज्या पाण्याच्या टाक्या बनवलेल्या असतात, त्यांना 'टाका' म्हणतात. राधेशाम हा लैच हुषार गाईड असल्याचे आमच्या लक्षात आले. रस्त्याने जाताना त्याने अचानक ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा आदेश दिला. आम्ही लैच उत्साहित झालो.
"वाघ हाये का?"
'हळू बोला, किल झाली हाये. ताजीच दिसते!" तो कुजबुजला
"किल?"
"हा दाखवतो ,गाडी रिव्हर्स घेऊ"

रस्त्यापासून जेमतेम फक्त २० फुटावर एक गायीएवढा गवा मरून पडलेला होता. त्याच्या मानेचा पोटाचा आणि मांडीचा बराचसा भाग खाऊन टाकलेला होता. लालभडक मांस दिसत होते, म्हणजे सकाळी सकाळी त्याची शिकार झाली होती. जवळपास ३०-३५ किलो मांस खाऊन टाकलेले असावे. म्हणजे ही वाघाच्या पूर्ण फ्यामिलीने केलेली शिकार होती. आम्ही त्या शहीद गव्याचे फोटो घेतले. ही शिकार अर्थातच डेणू आणि त्याच्या फ्यामिलीने केलेली होती. आम्ही तेथे लैच वेळ थांबलो. पण वाघ काही येईना.
"आपल्याला वाटते, तो बहुतेक झोपला असावा. कारण त्याला हे खाऊन सुस्ती आली असेल"
"बरोबर आहे. पण आसल जवळपास नक्कीच" गाईड म्हणाला.
आम्ही झाडीच्या आत नजर पोचेल तिथे बघू लागलो, पण दिसेना काही.. अगदी शांतता....शांततेचे जाणवणे हाच शांततेचा आवाज असतो का? लैच वेळा हा प्रश्न पडून गेला.
"पेर्ते व्हा " पावशाचा आवाज ...मनात म्हटले बाबा, भर उन्हाळ्यात आता काय पेरावे या भकास होत चाललेल्या जंगलात? दूरदूरपर्यंत फक्त सुकलेल्या झाडांची एक विरळ भिंत उभी असल्याचा भास होत होता. गाईड म्हणाला की त्याच्या लहानपणी मारुती चितमपल्ली येथे राहून गेले. ते याला चोकोलेटस् द्यायचे आणि अख्ख्या जंगलात पायी भटकायचे.
"त्यावेळचे जंगल असेच होते का?" आपण विचारले
त्यावर तो म्हणाला " नाही साहेब, आता १० % सुद्धा जंगल उरले नाही..."
एकंदरीत मारुती चितमपल्ली , व्यंकटेश माळगूळकर , आणि अलीकडे किरण पुरंदरे यांनी वर्णन केलेला निसर्ग आणि तेथिल जीवन आज इथे आपल्याला नक्कीच आढळले नाही.हे खेदाने नमूद करावेसे वाटते. इथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे, येथिल आदिवासींचे जीवनमान उंचावले आहे. मात्र नागझिरा लैच ओकाबोका आणि हतबल वाटला.इथे ऐन, सप्तपर्णी,वंश,धावडा, अशी झाडे मुख्यत: आहेत. पण एकंदरीत जंगल माणसांनी कापून खाल्लं आहे.

"तो बघा..डेणूच आहे." गाईड कुजबुजला "झोपलेला आहे, त्या तिथे बघा सरळ माझ्या बोटाच्या समोर - ते तेंदूच्या झाडाच्या बाजूला .."
"अरे हो, खरेच की " एक मित्र
"च्यायला दिसतेय हं काहीतरी पाठमोरा झोपला आहे." दुसरा मित्र
"काळपट पाठ हाये का?" तिसरा!
"थांबा क्यामेरात घेतो " पक्षीमित्र म्हणाला. मग त्याने २६ एक्स झूम करून दाखवले. कोणतातरी पाठमोरा प्राणी झोपलेला होता. मुळात पिक्सेल एवढे फाटले होते, की तो एखादा प्राणी तरी आहे का नाही ,की मुंग्यांचे वारूळ होते,समजेना.
'समजत नाही राव.."
"पण वाघच हाये तो"
"काय की बुवा"
"मला  पण दिसेना राव" एक मित्र म्हणाला .त्यामुळे आपल्याला थोडे हायसे वाटले. कारण एकतर आपल्याला चष्मा असल्याने आपल्या चष्म्यावर त्याचा दोष गेला असता. थोडक्यात आमच्यापैकी तिघांनी वाघ दिसला आणि तो वाघच होता, हे खात्रीने सांगीतले. एकाने आपण वाघासारखे काहीतरी पाहिले असे सांगीतले.तर आपल्यासह उरलेल्या दोघांनी आपणास काहीच दिसले नाही, असे घोषित केले. कारण वाघ जर झोपलेला होता, तर तो अजूनही तेथेच असायला हवा होता. पण आता तो गाईडला सुद्धा दिसेना. एकंदरीत हे प्रकरण संशयास्पद होते.
"पण संध्याकाळी डेणू पाच वाजेला इथे किलजवळ नक्की येणार " इति गाईड .
त्याचे हे म्हणणे मात्र पटले कारण त्याला भूक लागली की तो इथे येणारच होता. पण ही तिसरी सफारी असल्याने आणखी एक सफारी वाढवणे म्हणजे आणखी एक दिवस पांढरा हत्ती पोसणे ठरले असते. एकूण बिल ६ जणांत जवळपास २४००० झाले होते, म्हणजे प्रत्येकी ४००० खर्च दीड दिवसांत आतापर्यंत झालेला होता. त्यात  २००० रुपयांचे तर मिनरल वाटरच संपवले होते.

एकंदरीत येथून वैतागून आम्ही दुसऱ्या स्पॉटकडे निघालो. एका ठिकाणी वानराचा कॉलिंग अलार्म झाला म्हणून थांबलो. दुसऱ्याच क्षणी एका झाडावर ते वानर आणि त्या पाठोपाठ बिबट्याची उडी एका फांदीवरून अत्यंत चपळाईने घेतलेली उडी...वानराची एक अर्धवट किंचाळी...मग सारे शांत झाले. बिबट्याने वानराची शिकार केली होती.हा एक चित्तथरारक क्षण होता. इथेही क्यामेरा निरुपयोगी ठरला. कारण  तो विजेसारखा चमकून गेलेला क्षण निसटून गेला..

परतीच्या वाटेवर एक सर्पगरुड झाडावर समाधी लावून बसलेला दिसला. अगदी निवांत. मस्त आरामात होता. त्याचे मनसोक्त फोटो घेतले. हळद्या लैच वेळा दिसला, सुतारपक्षी, रॉकेट टेल, स्ट्रीपड बर्डस, किंगफिशर, हरियाल, असे अनेक पक्षी दिसले. हा प्रदेश पूर्वी हत्तींसाठी प्रसिद्ध असावा. कारण संस्कृतमध्ये हत्तीला नाग हा शब्द आहे. आज तिथे आपल्याला एकच हत्ती दिसतो -पाळलेला आणि साखळदंडांनी बांधलेला !

कच्च्या रस्त्यावरील धुळीने चांगल्या कपड्यांची वाट लावून टाकली. आणि चेहऱ्यावर धुळीचा थर साचला होता. मुक्कामावर परतल्यावर पुन्हा एकदा अंघोळ केली .थोडी हुरहूर आणि खंत वाटत राहिली. म्हणून त्या परिसराचे जमतील तेवढे फोटो घेतले. नागझिरा सोडताना  मनातल्या मनात म्हणालो, " आपण इथे लैच वेळा पुन्हा येऊ !"

- फेस बुके
facebookay55@gmail.com
copyright (c) all rights reserved 


Sunday 16 October 2011

एक आकाश सोडताना...

‎"आपण समजतो ते
आपले  आकाश असतेच  असे नाही;
आणि आपणही आकाशाचे असतोच, असेही नाही.
क्षितीज ही न संपणारी गोष्ट असते..
असंख्य क्षितिजे ओलांडून
केव्हातरी उमगेल तुला
किती अंतर पार करून आला आहेस..
हेच तर जीवन आहे!
भरारी घेत रहा, थकू नकोस,
आकाशाला आधार मानू नकोस,
आणि आकाशाचा आधार होण्याचा
प्रयत्नही करू नकोस!
कितीही म्हटले तरी आपण कुणाचे
पूर्णांशाने असतो का?"
आणि आपलंही कुणी...?
खंत आणि खेद यांना तसा काही अर्थ नसतो,
त्याच त्या भोवऱ्यात रेंगाळत राहू नकोस!
एक आकाश सोडताना, मागे वळून पाहू नकोस!
· · October 6 at 8:44pm

Wednesday 14 September 2011

ईद मुबारक

संस्कृती ही भौगोलिक सीमारेषांनी मर्यादीत करता येत नाही.कालान्वाये बदल अपरिहार्य असतात.आज भारत-पकिस्तान वेगळे झाले नसते,तर एक अखंड देश राहिला असता.. तर आपण कदाचित आजच्या पाकिस्तानच्या त्या टोकावर वस्ती करून राहिलो असतोच.आपल्या संविधानाने सर्वधर्मसमभाव तत्व अंगिकारले आहे.त्यामुळे संविधानाला अनुसरण करणे आणि या देशातील सर्व लोक भारतीय नागरिकांच्या धर्म,भाषा,इत्यादी विविधतांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे.जेव्हा आपण इतर धर्मियांचे सण आपल्या धर्माप्रमाणे साजरे करू तेव्हाच कदाचित आपण खऱ्या अर्थाने भारतीय होऊ! ईद मुबारक!!!

Tuesday 13 September 2011

आपले देशप्रेम आणि भौगोलिक परिस्थिती


by फेस बुके on Saturday, August 6, 2011 at 6:23pm
आता मी काही कुणी राजकीय विश्लेषक नाही,हे आपणांस माहित आहेच.भारतवर्ष/हिंदुस्थान ही अर्थातच एक अर्थातच एक भौगोलिकदृष्ट्या समजून घेण्याची गोष्ट आहे.पूर्वीही अनेक छोटी मोठी राज्ये भांडत होतीच.मला तर वाटते भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र असल्यामुळे आणि एका बाजूला हिमालयासारखे मोठे डोंगर असल्यामुळे भारतीय लोकांना स्थलांतरित होणे फारसे जमले नसावे.कारण पूर्वीच्या काळी दळणवळणाची सोय होतीच कुठे? आता एखाददुसरा कोणी एवढा मोठा सागर किंवा हे विशाल पर्वत लांघून गेला असेल,तर तो तिकडेच अडकून पडला असण्याची शक्यता आहे.कारण वास्को द गामा किंवा हिंदुस्थानला येण्याच्या नादात चुकून अमेरिकेला जाऊन पोचलेला कोलंबस (चू.भू.देणे घेणे इतिहासात फारशी गती आपल्याला कधीच नव्हती)किंवा इतर तत्सम मनुष्याची जशी दखल इतिहासाने घेतली तशी ती त्या तत्सम हिंदुस्थानी मनुष्याचीही अर्थातच घेतली असती.आणि जे लोक हिमालयात गेले,ते म्हणजे एकतर या संसारातून मुक्त झाले,किंवा फार तर गिर्यारोहक झाले असावेत.थोडक्यात म्हणजे प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेला हा देश परकीय आक्रमणाला अर्थातच बळी पडत गेला.कारण इथे सारेच एकमेकांचे शत्रू होते.म्हणून स्वप्रदेशातील लोकांशी गद्दारी करून यांनी आपल्याच राजे लोकांवर आक्रमण करून परकीयांचे मांडलिकत्व पत्करण्यात धन्यता मानली.या ठिकाणी अगदी निर्विवादपणे आपण म्हणू शकतो,की हिंदुस्थान हा भौगोलिकदृष्ट्या नैसर्गीक सीमारेषांमुळे बांधला गेलेला आणि अनेक छोट्या प्रदेशांचा मिळून बनलेला एक मोठा समूह होता,जो आज सुध्दा अर्थातच आहे.येथिल लोकांमध्ये आपसात फार प्रेम,बंधुभाव होता असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरावे! आज भारत किंवा हिंदुस्थान हा पूर्वी जसा होता तसाच तो आजही असंख्य अंतर्विरोधांनी भरलेला आहे.आणि हे विविध सीमावाद,भाषावाद,जाती,जमाती
,धर्म,पंथ वर्णभेद आपली राज्यघटना मोडून काढू शकली नाही.कारण स्पष्ट आहे-इथल्या बहुतांश लोकांना देशप्रेम कशाशी खातात,हे माहित नाही.कारण,ते अशिक्षित, अज्ञानी आहेत आणि त्यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे.आणि जे सुस्थितीत आहेत,त्यांनी देशात विविध धर्माच्या आणि भेदाभेदांच्या नावावर स्वतःचे वर्चस्व सिध्द करण्याचा सपाटा चालवला आहे.कारण पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने मिळालेले वर्चस्व एक राज्यघटना काय खोडू शकेल अशा समजात ते वावरत असून घटना बदलण्याच्या गोष्टी अधूनमधून बोलत असतात.आणि यात सर्वात धूर्त एक वर्ग आहे पुढाऱ्यांचा-त्यांना तर ही  इतर दोन वर्गांची आजची जीवनपद्धती त्यांच्या पथ्यावर पडणारीच आहे ! आता धर्माकडे क्षणभर वळू कारण तो संवेदनशील मुद्दा आहे.तर एखाद दुसरा अपवाद वगळता भारतातील धर्मांनी आपल्याच धर्मातील लोकांचेही चांगले पाहिले नाही.म्हणून धर्म ही संकल्पना आज आज एका विचित्र अवस्थेला येऊन पोचली  आहे.त्यामुळे कोणताही धार्मिक मुद्दा आज अत्यंत टाकावू बनला आहे.
आता आमचे हायस्कुलातले बेम्भाटे मास्तर नेहमीच सांगायचे की आपण कितीही निरर्थक असे लांबलचक काहीही लिहिले की त्याचा निष्कर्ष?त्या विश्लेषणातून उद्भवणारे प्रश्न हे मांडले  गेलेच पाहिजे.म्हणून थोडक्यात निष्कर्ष /प्रश्न असे-
१)प्रत्येक व्यक्तीला अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजा आहेत.देश वगैरे ही गोष्ट त्यानंतरची दुय्यम/तिय्यम प्रकारात मोडणारी आहे का?
२)येथिल बहुतांश लोकांना इतरांवर वर्चस्व गाजविणेची असलेली जुनी खरुज कोणत्याही औषधाने मिटणे शक्य नाही.कारण अशा प्रकारची खरुज ही अनुवंशिक असते असे कुणीतरी तज्ञ व्यक्तीने म्हटलेच आहे.तसे ते कुणीही म्हटले नसल्यास मीच इतक्यात म्हटले आहे,असे समजावे.
३)येथिल विविध अंतर्विरोध हे एका व्यक्तीव्यक्तीमधील संपर्कातील अडथळे /भिंती आहेत का?.या भिंती अनुवंशिक असल्यामुळे त्या जर्मनीच्या भिंतीप्रमाणे पाडून टाकणे शक्य नाही कारण त्या असूनही दिसत नाहीत?
४)तरीही भारत हा देश एकत्र इतकी वर्षे का राहिला,यात आश्चर्य म्हणजे काहीच नाही.ही केवळ निसर्गाची कृपा आहे.आणि तो पुढेही तसाच राहील,याचेही कारण तत्कालीन अपवादात्मक लोकांचे देशप्रेम आणि त्याचे भौगोलिकदृष्ट्या असणारे स्थान आहे.आणि एवढ्या मोठ्या देशाला पोसणे ही आजच्या काळात इतर कोणत्याही देशाला केवळ अशक्य अशीच गोष्ट आहे.हे म्हणजे कोट्यवधी पांढऱ्या हत्तींना पोसण्यासारखे आहे.
५)काही अपवादात्मक लोकांनी विखुरलेल्या साम्राज्याला एकत्र केले होते.त्यांना स्वातंत्र्यसैनिक असे म्हणतात.त्यांचे आजच्या भारताच्या असण्यात निसर्गाखालोखाल योगदान आहे.
६) काही तुमच्या - माझ्यासारखे बरेच अपवादात्मक लोक अजून शिल्लक आहेत,ज्यांना खरोखर देशाबद्दल खरोखर काही प्रेम आहे.पण आपण अगोदरच स्वतंत्र असल्यामुळे आपल्याला का म्हणून कोणी स्वातंत्र्यसैनिक म्हणेल? खरे म्हणजे स्वातंत्र्यात असूनही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागणे,यासारखे मोठे दु:ख संबंध पृथ्वीतलावर नाही.